Mahayuti Sabha at Shivaji Park : पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे शिवाजी पार्काला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं

Mahayuti Sabha at Shivaji Park : पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे शिवाजी पार्काला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

  मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळत असून पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी महायुती (Mahayuti) आणि इंडिया आघाडीची (India Alliance) लगबग पाहायला मिळत आहे. मुंबईत (Mumbai News) आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन मोठ्या सभा पार पडणार आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील. तर, महायुतीच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे नेते राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मोदी आणि राज पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे शिवाजी पार्काला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्तानं संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेला आहे. या मैदानाच्या चारही बाजूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटआउट्स देखील लावण्यात आले आहेत.

आजच्या सभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत. त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासोबतच राज ठाकरे काय भूमिका मांडणार? हे देखील महत्त्वाचं राहणार आहे.

पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर राज ठाकरे शेवटचं भाषण करणार नाही 

मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन मोठ्या सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल ,मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील. मात्र, प्रश्न हा आहे की, मुख्य भाषणाची आणि शेवटच्या भाषणाची संधी कुणाला मिळणार? तर दुसरीकडे मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांना शेवटचं भाषण करता येणार नाही.

 

You may have missed