देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis):केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे.

राज्यात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी  भाजपने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भाजपने नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. याशिवाय सदाभाऊ खोत परिणय फुके यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केलीय, याचा आनंद आहे. पंकजाताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे,असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला. त्याबद्दल मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर पंकजा मुंडेंबाबत आनंद व्यक्त करताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले, हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

पादुकांचे दर्शन घेणे यांच्या पालखीचे दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा क्षण

पालखी सोहळा आणि वारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने संपूर्ण भारताला देणारी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेणे यांच्या पालखीचे दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो.  तोच आनंद अनुभवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मला विश्वास आहे,जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहेत,तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा अखंडित राहील, असंही फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपकडून सावध पाऊलं उचलली जात आहेत. आगामी राजकीय समीकरणे विचारात घेऊन 5 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

You may have missed