अंबड शहरांमध्ये आज बंदची हाक दिल्यानंतर या ठिकाणी दुकाने बंद करून ओबीसी आंदोलनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.
अंबड(Ambad): ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. काल ओबीसी आंदोलकांनी आक्रमक होत धुळे सोलापूर महामार्गावरती टायर जाळून निषेध केला. लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासाळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे काल ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक दिली, आज या ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.
अंबड शहरांमध्ये आज बंदची हाक दिल्यानंतर या ठिकाणी दुकाने बंद करून ओबीसी आंदोलनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी आंदोलकांनी सरकारकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असून सरकारची अशीच भूमिका राहिली तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
हिंगोलीमधून हजारो ओबीसी समाज बांधव वडीगोद्रीकडे रवाना
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केला आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधव जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावाच्या दिशेने निघाले आहेत लक्ष्मण हाके यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे ओबीसी समाज बांधव हिंगोलीकडे निघाले आहेत
ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल
वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर महामार्गावर टायर जवळून रास्ता अडवल्याप्रकरणी आंदोलकावर गुन्हे दाखल, वडीगोद्री आणि जामखेड फाट्यावर आंदोलकांनी काल टायर जळून निषेध व्यक्त केला होता. गोंदी आणि अंबड पोलीस ठाण्यात 6 ज्ञात आणि 30 ते 31अज्ञात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायदा मंडळी जमा करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचा घोटाळा: हाके
लक्ष्मण हाके यांनी राज्यात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात 57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले हे आम्हाला शासनाने सांगावं. मनोज जरांगे पाटील म्हणतात की, मी 80 टक्के मराठ्यांना ओबीसीत घुसवले आहे. हे जर खरं असेल तर ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण झालेले आहे. मग राज्य सरकार ओबीसी आरक्षणाचे रक्षण कसे करणार, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला होता.