बीड(Beed): सगेसोयरेंची मागणी मान्य केली मग अंमलबजावणीस दिरंगाई का ? भाजप आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहेर.

बीड(Beed) हा कधीही राष्ट्रवादीचा गड राहिलेला नाही. आता बजरंग अप्पा निवडून आल्याने तो गड होणार नाही असे प्रतिउत्तरही बजरंग अप्पांना धस यांनी दिले.

बीड(Beed): सगेसोयरेंची मागणी ही शासनाने मान्य केली आहे. वाशीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाऊन पत्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. मग त्याची अंमलबजावणी करण्यास सरकार दिरंगाई का करत आहे? असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.  मुख्यमंत्र्यानी आता यामध्ये लक्ष आता घालणे गरजेचे आहे.आज पाठवलेल्या शिष्ठमंडळाने तरी जरांगेंची एखादी प्रमुख मागणी मान्य करायला हवी अशी प्रतिक्रिया धस यांनी  दिली. पंकजा मुंडेंच्या पराभवाचं विश्लेषण सुरेश धस यांनी केलं आहे.  बीड हा कधीही राष्ट्रवादीचा गड राहिलेला नाही. आता बजरंग अप्पा निवडून आल्याने तो गड होणार नाही असे प्रतिउत्तरही बजरंग अप्पांना धस यांनी दिले.

सुरेश धस  म्हणाले, आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेची भेट घेण्यासाठी अंतरवालीत जात आहे.  तिथे जाऊन चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा माझे मत आहे की,  बाकीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी घ्या. परंतु 26 जानेवारीला जो ड्राफ्ट दिला आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत तातडीने एकत्र बसून लगेच अंमलबजावणी केली पाहिजे. पटकन सगेसोयऱ्यांचा विषय संपवला पाहिजे.

बीडमध्ये बजरंग अप्पा निवडून आले, कारण सुरेश धस म्हणाले…

आरक्षण आंदोलन आणि मुस्लीम समाजाने एकत्र भाजपच्या विरोधात मतदान केल्यामुळे  बीडमध्ये(Beed) भाजपचा पराभव झाला आहे. बजरंग सोनावणेंनी मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाजाचे जास्त आभार मानले आहेत.त्याचे अनेक व्हिडीओ मी पाहिले आहे, असे देखील सुरेश धस म्हणाले.

 बीड हा राष्ट्रवादीचा गड कधीच नव्हता : सुरेश धस

बीड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे या खासदार बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यावर सुरेश धस म्हणाले,  बीड हा राष्ट्रवादीचा गड कधी नव्हता. 2009 पासून मुंडे निवडून आले होते. त्यानंत तो गड भाजपचा होता. आत्ता तुम्ही निवडून आला म्हणून लगेच तो तुमचा गड होत नाही.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरावाली सराटी येथे दाखल होणार आहे.