जळगाव(Jalgaon): रक्षा खडसे केंद्रात मंत्री झाल्या, पहिल्यांदाच जळगावात आल्या, सर्वात आधी काय केलं?

मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगावात आल्या. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले गेले. त्यानंतर त्यांनी जी एक कृती केली त्याने सर्वच जळगावकरांची मने त्यांनी जिंकली.

जळगाव(Jalgaon): रक्षा खडसे यांची केंद्रीय क्रीडा व युवा राज्यमंत्री पदी वर्णी लागली. त्या रावेर लोकसभेतून त्यांनी हॅटट्रिक केली आहे. एककडे राज्यात भाजपच्या दिग्गजांना पराभवाची चव चाखायला मिळत होती. त्याच वेळी रक्षा खडसे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्याचे बक्षिसही त्यांना केंद्रात मिळाले. त्यांच्यावर क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच जळगावात आल्या. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले गेले. त्यानंतर त्यांनी जी एक कृती केली त्याने सर्वच जळगावकरांची मने त्यांनी जिंकली.

सरपंच ते केंद्रीय मंत्री 

रक्षा खडसे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून केली होती. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच मुक्ताईनगरमध्ये आल्या होत्या. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर  रक्षा यांनी कोथळी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. ग्रामपंचायतच्या उंबरठ्याचे त्यांनी दर्शन घेतले. कोथळी ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून रक्षा खडसे यांनी राजकारणात पदार्पण केले होते. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर रक्षा खडसे यांनी ग्रामपंचायतीच्या उंबरठ्याचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या कृतीने त्यांनी सर्वांचीच मने जिंकली.

‘हा मान जनतेचा’ 

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर रक्षा खडसे प्रथमच रावेर लोकसभा मतदारसंघात दाखल झाल्या. मंत्रीपद मिळाल्याचा मान हा जिल्ह्यातील जनतेचा असल्याचे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. ऊन सावलीप्रमाणे आयुष्यात चांगलं वाईट असतं त्यामुळे संघर्षाला सामोर गेलं पाहिजे. माझ्या संघर्षात जनतेने मला साथ दिली. त्यामुळेच आज मंत्रीपदापर्यंत आपण पोहोचू शकले, अशा भावना यावेळी रक्षा खडसे यांनी व्यक्त केल्या.

खडसे महाजनांनी एकत्र यावे 

एकनाथ खडसे यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा या निवडणुकीत झाल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. वेळेवर त्यांनी दिलेली साथ फायद्याची ठरली असेही त्यांनी सांगितले. जळगावच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांचे बिनसले आहे. यावरही रक्षा यांनी भाष्य केले. या दोन्ही नेत्यांनी एकत्र आलं पाहीजे अशी आपली इच्छा आहे असेही त्या म्हणाल्या. भविष्यात या दोघांनीही एकत्र यावे यासाठी प्रयत्न करू असंही त्यांनी स्पष्ट केले.

रावेरमध्ये मिळवला मोठा विजय 

रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे आव्हान होते. त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल असे चित्र होते. राष्ट्रवादीनेही जागा जिंकण्यासाठी जोर लावला होता. ऐन वेळी खडसेंनी भाजपला साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे रक्षा यांचे पारडे काही अंशी जड झाले होते. निवडणूक निकालावरूनही ते स्पष्ट झाले. रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांचा दोन लाखा पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. राज्यात एकीकडे भाजपचे दिग्गज उमेदवार आणि मंत्री पराभूत असताना रक्षा खडसे यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. त्याची पोचपावती म्हणून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली.

You may have missed