Lok Sabha Elections 2024 : ‘देश वाचवण्याची शेवटची संधी….’ PM मोदींचं नाव घेत मनमोहन सिंग यांचं भावनिक आवाहन

Lok Sabha Elections 2024 : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Dr. Manmohan Singh) यांनी पंजाबमधील मतदारांना खुलं पत्र लिहिलं आहे.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) शेवटच्या टप्प्यात 8 राज्यातील 57 जागांवर 1 जून रोजी मतदान होणार आहे. सातव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी संपला. या टप्प्यात पंजाबमधील सर्व 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदानाच्यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Dr. Manmohan Singh) यांनी पंजाबमधील मतदारांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलीय. मनमोहन सिंग यांनी अनेक मुद्द्यांचा उल्लेख करत सरकार बदलण्याची गरज का आहे हे स्पष्ट केलंय.

माजी पंतप्रधानांनी या तीन पानी पत्रात, आपली लोकशाही आणि राज्यघटनेला निरंकुश सत्तेकडून होणाऱ्या वारंवार हल्ल्यापासून बचाव करण्याचा ही शेवटची संधी आहे. या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा,’ असं आवाहन केलंय.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दोन कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या अकल्पनीय उलथापलथीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलाय.

‘पंतप्रधानांनी पदाची प्रतिष्ठा कमी केली’

मनमोहन सिंग यांनी सांगितलं की, ‘पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचार सभेत द्वेषपूर्ण भाषणाची नवी पातळी गाठली आहे. आजवरच्या इतिहासात पंतप्रधानांनी समाजातील एक खास वर्ग किंवा विरोधी पक्षाला टार्गेट करण्यासाठी या प्रकारच्या खालच्या पातळीचे किंवा असंसदीय शब्द वापरलेले नाहीत. मोदी हे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य कमी करणारे पहिले पंतप्रधान आहेत.’

डॉ. मनमोहन सिंग 1991 साली नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम केलंय. त्यांनी या पत्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकारच्या 10 वर्षांमधील कार्यकाळातील प्रमुख सामाजिक, राजकीय आणि आर्थिक निर्णयाची आणि विद्यमान सरकारसोबत एक तुलना सादर केली.

GDP दर निचांकी पातळीवर

देशाची अर्थव्यवस्था आणि जीडीपी दराबाबत माजी पंतप्रधानांनी काळजी व्यक्त केलीय. ‘नोटबंदीचं संकट, दोषयुक्त जीएसटी आणि कोरोना व्हायरसच्या काळातील खराब व्यवस्थापनामुळे देशात ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये 6 ते 7 टक्क्यांपेक्षा कमी GDP दर वाढण्याची आशा ही सामान्य बाब बनलीय.त्यांनी सांगितलं, ‘भाजपा सरकारच्या काळात सरासरी GDP दर 6 टक्क्यांपेक्षा खाली घसरलाय. काँग्रेस आणि यूपीएच्या कार्यकाळात हा दर जवळपास 8 टक्के होता. बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे असमानता वाढली आहे.’

अग्नीवीर योजना

पंजाबच्या मतदारांना लिहिलेल्या पत्रात माजी पंतप्रधानांनी सांगितलं, ‘मोदी सरकारनं सशस्त्र दलावर अग्नीवीर योजना लादली आहे. देशभक्ती, शौर्य आणि सेवा यांचे मूल्य फक्त 4 वर्ष आहे, असा भाजपाचा समज आहे. हे त्यांच्या नकली राष्ट्रवादाचं प्रतीक आहे.’

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही टीका

माजी पंतप्रधानांनी 2020-21 पासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलाच्या प्रकरणात केंद्र सरकारची टीका केली. ते म्हणाले, ‘जवळपास 750 शेतकरी ज्यामध्ये पंजाबमधील संख्या अधिक होती. ते दिल्लीच्या बॉर्डरवर अनेक महिने वाट पाहता-पाहता मृत्यूमुखी पडले. लाठीमार आणि रबरच्या गोळ्या पुरेशा नव्हत्या. पंतप्रधानांनी संसदेत ‘आंदोलनजीवी’ आणि ‘परजीवी’ म्हणत आपल्या शेतकऱ्यांची हेटाळणी केली होती.

भाजपा सरकारनं गेल्या दहा वर्षात पंजाब, पंजाबी आणि पंजाबियतला बदनाम करण्यात कोणतीही संधी सोडलेली नाही. मोदींनी काही चुकीच्या वक्तव्यासाठी माझ्यावर ठपका ठेवलाय. मी माझ्या आयुष्यात कधीही एका समुदायाला दुसऱ्या समुदायापासून वेगळं केलेलं नाही. तो कॉपी राईट फक्त भाजपाकडं आहे,’ असं डॉ. मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं.

You may have missed