Loksabha Election 2024 : लेकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशीही शरद पवारांनी स्वत:ला झोकून दिलं

बारामतीमध्ये शरद पवारांच्या सभांचा धडाका..

 

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ बारामतीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. येत्या 7 तारखेला बारामतीमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळेआज संध्याकाळी 5 वाजल्यापासून येथील प्रचार थांबणार आहे. आज बारामतीसह मतदान असलेल्या राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये सकाळपासून प्रचाराची धामधुम सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर बारामतीची आणि राज्यातील इतर भागात मविआच्या प्रचाराला बळ देण्याची दुहेरी जबाबदारी आहे.

शरद पवार यांची शनिवारी साताऱ्यात सभा झाली होती. त्यानंतर आज सकाळपासून शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सभांचा धडाका लावला आहे. आज सकाळी शरद पवार यांनी सर्वप्रथम भोर येथील आर.आर. हायस्कूलच्या मैदानावर सभा घेतली. या सभेतच शरद पवार यांचा आवाज पूर्णपणे बसल्याचे जाणवत होते. अनेकदा त्यांना शब्द उच्चारणेही कठीण जात होते. परंतु, या परिस्थितीमध्येही शरद पवार यांनी नेटाने आपले भाषण पूर्ण केले. देशाचा कारभार आज मोदी सरकारच्या हातात आहे. मात्र, ते मनमानी पद्धतीने राज्य चालवत आहेत. त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय सामान्य जनतेच्या भल्याचे नाहीत, असे शरद पवार यांनी या सभेत सांगितले.

शरद पवार यांनी भोर नंतर इंदापूर येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर सभा घेतली. या सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार येताच घोषणाबाजी सुरु केली. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज… शरद पवार, शरद पवार’ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. तेव्हा शरद पवार यांनी, ‘बुलंद आवाज सध्या बसलाय’ अशी मिश्कील टिप्पणी केली. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर शरद पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तेव्हादेखील शरद पवार यांच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्टपणे जाणवत होता. त्यांचा आवाज पूर्णपणे बसल्यामुळे काहीवेळा त्यांच्या तोंडातून एखादा शब्द अस्पष्ट उमटत होता.

 

यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, मी याठिकाणी साधारणत: 40 सभांमध्ये भाषण करुन आलोय. साहजिकच या सगळ्याचा परिणाम गळ्यावर होतो. त्यामुळे मी आज या स्थितीत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. या सभेनंतर शरद पवार यांची बारामतीतील मोरगाव येथे सभा होणार आहे. यापूर्वी शरद पवार यांची साताऱ्यातील पावसाची सभा चांगलीच गाजली होती. त्यावेळी अनेकांनी शरद पवारांच्या या कृतीचे कौतुक केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवार बारामतीमध्ये त्याच जिद्दीने प्रचार करताना दिसत आहेत. याचा सुप्रिया सुळेंना कितपत फायदा होणार, हे आता 4 जूनला निकालाच्यावेळी स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीसाठी आपण सगळे एकत्र आलोय. ही निवडणूक देशाची आहे. देशाला नवी दिशा नवीन रस्ता दाखवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या देशाचा कारभार भाजपच्या हातात आहे. संबंध देशाचा कारभार हाती आल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने पावलं टाकली आहेत, त्यामुळे समाजातील एका मोठ्या वर्गात अस्वस्थता आहे. त्यामुळेच आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली. त्यानंतर परिस्थिती बदलत आहे. आज तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे. ही राज्यं सोडून देशात कुठेही भाजपचं राज्य नाही. देशातील जनतेच्या सुखदु:खांची दखल घेऊन कारभार करण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

You may have missed