Manoj Jarange : मनोज जरांगेंनी उडवली चंद्रकांत पाटील यांची खिल्ली

फक्त ‘तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात, स्वतःची ३७ मतं तरी त्यांना पडतात का? असं म्हणत मनोज जरांगेंनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे…

 

Manoj Jarange : मी ८ जून रोजी नारायणगड या ठिकाणी भव्य सभा घेतो आहे. १५ मेच्या दिवशी मी तिथल्या जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर, राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांना या विराटसभेसाठी आवाहन करण्यात येईल. या सभेला सहा कोटी मराठा बांधव या ठिकाणी येतील असंही जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. १५ मेच्या पाहणीनंतर सभेविषयी मी अंतिम निर्णय घेणार आहे. तसंच,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच पंकजा मुंडे जातीचं राजकारण करत आहेत असंही ते म्हणाले.

पंकजा मुंडेंना निवडणुकीत पाडा असं मी कुठेच बोललो नाही. उलट त्याच जातीयवादी राजकारण करत आहेत. भरसभेत त्या म्हणतात आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे. त्याचवेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणे गरजेचं होतं. मात्र, त्यांनी आक्षेप घेतला नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे, असं म्हणत जरांगेंनी बीडमधल्या राजकीय वातावरणाबाबत म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं आहे? त्यांना काय कळतं. फक्त ‘तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात, स्वतःची ३७ मतं तरी त्यांना पडतात का?, असं म्हणत मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange )चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हणावं एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करायला लावला, मी त्यांचं नाव लगेच घेणं बंद करतो. माझा एकच सवाल आहे, आमच्यावर गुन्हे कोणी दाखल केले? एसआयटी आमच्या विरोधात का नेमली? याचं उत्तर द्या. असे सवाल जरांगेंनी उपस्थित केले आहेत. तसंच, प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश असूनही देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र देऊ नका असे आदेश दिले आहेत, तुम्ही असं का करत आहात? भाजपाच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो, अन्यथा भाजपाचे १०६ आमदार निवडून आले नसते, असं म्हणत जरांगेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

You may have missed