नवनीत राणा : हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी ही निवडणूक आहे

नवनीत राणा यांनी गुजरात येथे निवडणूक प्रचारात सुद्धा असं वक्तव्य केलं होतं. ‘ज्यांना जय श्री राम म्हणायचं नाही, त्यांनी पाकिस्तानात निघून जावं’ असं त्या म्हणालेल्या

 

हैदराबाद हा एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपाने प्रचारात पूर्ण ताकद झोकली आहे. भाजपाने हैदराबादमधून असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात माधवी लता यांना तिकीट दिलं आहे. हिंदुत्ववादी नेत्या म्हणून माधवी लता यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये गेल्या होत्या. तेलंगणसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपाने नवनीत राणा यांचा समावेश केला आहे. याच नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे प्रचारा दरम्यान वाद निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे. भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी नाव न घेता ओवैसी बंधुंवर प्रहार केला.

नवनीत राणा यांनी प्रचारसभेत एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त विधानाचा दाखला दिला. “छोटा म्हणतो पोलिसांना 15 मिनिटासाठी हटवा, मग आम्ही दाखवतो काय करु शकतो ते, छोट्याला माझं एवढच सांगणं आहे की, तुला 15 मिनिट लागतील, पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, तर छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) आणि मोठा (असदुद्दीन ओवैसी) यांना समजणारच नाही की, ते कुठून आले आणि कुठे गेले” असं नवनीत राणा म्हणाल्या. वर्ष 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीने हे प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. अकबरुद्दीन म्हणालेला की, 15 मिनिटासाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही दाखवून देऊ, कोणात किती दम आहे. या प्रकरणात कोर्टाने त्यांची सुटका केली.

नवनीत राणा यांनी अकबरूद्दीनच्या जुन्या वक्तव्याच्या आधारावर ही टिप्पणी केली. “हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी ही निवडणूक आहे. यावेळी मतदान होणार, ते फक्त देश हितासाठी होईल. यावेळी हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी मतदान करायचं आहे. आमची वाघिण माधवी लता यांना देशाच्या संसदेत पाठवण्यासाठी यावेळी मतदान करायचं आहे. हैदराबादमध्ये सगळ्या हिंदुंना जाग करण्यासाठी मतदान करायचं आहे” असं नवनीत राणा म्हणाल्या.

नवनीत राणा यांनी गुजरात येथे निवडणूक प्रचारात सुद्धा असं वक्तव्य केलं होतं. ‘ज्यांना जय श्री राम म्हणायचं नाही, त्यांनी पाकिस्तानात निघून जावं’ असं त्या म्हणालेल्या. महाराष्ट्रात अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि एनसीपीच्या मदतीने अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती. यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना अमरावतीमधून लोकसभा निवडणुकीच तिकीट दिलं.

You may have missed