इंदौर:
लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागणार आहे. इंदौर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
एकीकडे निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना काँग्रेसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंदौर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्जाची मुदत संपल्याने या जागेवरील काँग्रेसची उमेदवारी आता संपुष्टात आली आहे. काँग्रेसला धक्का देत अक्षय बम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अक्षय बम यांच्यासह भाजपचे विद्यमान आमदार रमेश मंडोला यांनी डीसी कार्यालयात पोहोचून उमेदवारी अर्ज मागे घेतला. बम यांचा हा निर्णय काँग्रेससाठी अतिशय धक्कादायक आहे. अद्याप पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले की, इंदौरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी सोशल मीडियावर अक्षयसोबतचा सेल्फी पोस्ट करून भाजपमध्ये त्याचे स्वागत केले आहे. विजयवर्गीय यांनी लिहिले, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी, मुख्यमंत्री मोहन यादव जी आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा जी यांच्या नेतृत्वाखाली इंदौरमधील काँग्रेस लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचे भाजपमध्ये स्वागत आहे.’ या सेल्फीमध्ये विजयवर्गीय आणि अक्षय बम एका कारमध्ये एकत्र जाताना दिसत आहेत.