खेड दिवाणखवटीजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरड काढल्यानंतरही त्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.
रत्नागिरी(Ratnagiri):गेल्या आठवडाभरापासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी एक्स्प्रेस गाड्यांवर याचा परिणाम झाला. खेड दिवाणखवटीजवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली होती. 24 तासांनंतर दरड हटवण्यात आली असली तरीही अद्याप वाहतूक सुरळीत झाली नसल्याचं दिसून येत आहे.
कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली असली तरी अनेक गाड्या कोकण रेल्वे प्रशासनाकडून (Kokan Railway) रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस अशा गाड्या सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. तर तेजस एक्सप्रेस आज मुंबईहून दोन तास उशिरा सुटणार आहे. मंगला आणि ओखा एक्स्प्रेस या दोन गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावल्या तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.
मंगला एक्स्प्रेस साडेचार तास, जबलपुर एक्स्प्रेस दीड तास, उधाणा एक्स्प्रेस रिशेड्युल करण्यात आली आहे. तर आज मडगाववरून मुंबईच्या दिशेने सिंधुदुर्ग एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तुतारी एक्स्प्रेस या गाड्या धावणार आहेत.
खेड दिवाणखवटीजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरड काढल्यानंतरही त्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. तो काढण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर होतं. त्यानंतर तब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र अद्यापही कोकणातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.