उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली नसती तर आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली नसती. काही निर्णय घ्यावे लागतात. तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. मोदींना(नरेंद्र मोदी) तिसऱ्यांदा निवडणून आणायचं आहे हे आमच्या मतदारांना माहीत आहे. मोदींना, भाजपाला खिंडीत गाठायचं ठरवलं होतं पण तो प्रयत्न आपण हाणून पाडला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी आमच्याशी बेईमानी केली
“उद्धव ठाकरे हे भाजपासह युती करुन विधानसभेची निवडणूक २०१९ मध्ये निवडून आले. उद्धव ठाकरेंचे फोटो तेव्हा स्टँपसाईज आणि मोदींचे फोटो लाइफसाईज असायचे. सगळ्या निवडणूक प्रचारात मोदींचे फोटो लावून निवडून आले. तसंच त्यावेळी प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा हे सगळे सभांमधून सांगायचे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या सभांमधून हेच सांगायचे. पण निकालाचा दिवस उजाडला आणि संख्याबळ समोर आलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की गणित बसणार नाही. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला निवडणुकीच्या आधीच बरोबर घेतलं होतं. ती तयारी अशासाठी होती की थोडं भाजपाला खाली आणू. पण संख्याबळ पाहिलं तशी उद्धव ठाकरेंनी बेइमानी केली. त्यानंतर ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं.” ही बेईमानीच आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवारांशी उद्धव ठाकरेंनी २०१९ च्या निवडणुकीच्या आधीच संधान साधलं होतं
शरद पवारांशी उद्धव ठाकरेंनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच संधान साधलं होतं. कारण जिथे काँग्रेसविरोधात शरद पवारांचा पक्ष लढत होता तिथे उद्धव ठाकरेंना मदत करायची आणि शरद पवार जिथे भाजपा विरोधात लढत आहेत तिथे उद्धव ठाकरेंनी मदत करायची असं त्यांचं ठरलं होतं. यामागे असलेलं लॉजिक शरद पवारांनी त्यांना समजावलं होतं. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की एकट्या भाजपाच्या १३० जागा येऊ शकतात. त्या आल्या तर भाजपा तुम्हाला विचारणार नाही त्यामुळे आपण एकमेकांना मदत केली तर भाजपाच्या जागा कमी होतील. आमच्या जागा वाढल्या तर विरोधी पक्ष म्हणून आम्हीही भाजपावर अंकुश ठेवू. पुण्यात आम्ही जेव्हा हरलो तेव्हाची अख्खी शिवसेना राष्ट्रवादीच्या मागे उभी होती. असे प्रकार अनेक ठिकाणी आमच्या लक्षात आले असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा व्हिजन या विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आम्हाला सगळं लक्षात येईपर्यंत..
“आम्हाला हा सगळा प्रकार निवडणूक काळात लक्षात आलं. निवडणूक प्रक्रिया इतकी वेगात होते त्यामुळे जोपर्यंत लक्षात येतं तोपर्यंत काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. बंडखोरीही झाली होती. मी ९० ते ९५ टक्के भाजपाचे बंडखोर मागे घेतले. उद्धव ठाकरे फक्त फोन लावायचे पण बंडखोर एकही परत घेतला नाही. मग ते काय बोलायचे?” असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मोदी लाट का दिसत नाही? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मोदी लाट का दिसत नाही? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणूक देशाची आहे, त्यामुळे आम्ही मोदींच्या नावेच मतं मागणार, एनडीएचं कुणीही निवडून आलं तरीही त्याचं मत हे मोदींनाच मिळणार आहे. यूपीएचं कुणी निवडून आलं तर त्याचं मत हे राहुल गांधींना मिळणार आहे. असं आपण समजू कारण त्यांचा नेता अद्याप ठरलेला नाही. निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच आहे. शांतपणे निवडणूक चालली आहे असं जे वाटतं आहे तर त्याचं कारण आहे. २०१४ मध्ये एका आशा असलेला मतदार होता त्याने मोदींना मतदान केलं. २०१९ मध्ये मतदारांनी पाच वर्षांमधलं काम पाहिलं आणि मतदान केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार भाजपाचा मतदार झाला आहे त्यामुळे जो तुमचा मतदार असतो तो शांतपणे मतदान करतो. आमचे मतदार जे आहेत त्यांच्या मनात हे पक्कं आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये लाट होती आत्ता दिसत नाही ही चर्चा होते, याचं कारणच ते आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत