(Monsoon Budget Session of Parliament):आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, ही 6 विधेयकं सादर होण्याची शक्यता!

सोमवारपासून सुरू होणारं संसदेचं अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. यामध्ये एकूण 19 दिवस कामकाज होईल.

(Monsoon Budget Session of Parliament):संसदेचं अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनआजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये मंगळवारी वित्तमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प  सादर करतील. तर या अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षांकडून नीट पेपर लीक, रेल्वे सुरक्षा आणि उत्तर प्रदेशात कावड यात्रेबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय या मुद्द्यांसह इतर अनेक विषयांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा. काँग्रेसचे नेते गौरव गौगोई आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान सहभागी झाले होते.

सोमवारपासून सुरू होणारं संसदेचं अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. यामध्ये एकूण 19 दिवस कामकाज होईल. तसेच सरकारकडून 6 विधेयकं सादर होण्याची शक्यता आहे. त्यात 90 वर्षे जुन्या विमान अधिनियमाला बदलण्याच्या विधेयकाचाही समावेश आहे. तसेच काश्मिरच्या अर्थसंकल्पालाही संसदेकडून मंजुरी दिली जाईल. मात्र यादरम्यान, विरोधी पक्षांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात आज वित्तमंत्री निर्मला सीतारमन आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. तर उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

संसदेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचं अध्यक्षपद संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवलं. सत्ताधारी एनडीएमधील जेडीयू तर तटस्थ असलेल्या वायएसआर काँग्रेसने बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तृणमूल काँग्रेस पक्ष या बैठकीत सहभागी झाला नाही. तर एनडीएमधील जीतनराम मांझी आणि जयंत चौधरी हेसुद्धा या बैठकीला अनुपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने कावड यात्रेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच दुकानावर दुकानदाराचं नाव लावण्याची सक्ती करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले.

विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता

1. अग्निवीर योजना
2. ⁠नीट पेपर लीक वाद
3. ⁠दहशतवादी हल्ले
4. ⁠रेल्वे अपघात
5. ⁠मणिपूर हिंसाचार
6. ⁠हाथरस चेंगराचेंगरी
7. कावड यात्रा

अग्नीवीरः 1 जुलै 2024 ला राहुल गांधी लोकसभेत म्हणाले होते की, अग्निवीर सरकारसाठी यूज ॲण्ड थ्रो कामगार आहे. जवानांना सरकार ना पेन्शन, ना भरपाई, ना शहीद दर्जा दिला जातो. राहुलच्या या वक्तव्यानंतर या मुद्द्यावरून वाद सुरू झाला.

NEET UG: नीट पेपर लीक प्रकरणावरून विरोधक संसदेत आक्रमक होणार आहेत. कारण केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पेपर लीक झाले नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिलंय.

दहशतवादी हल्ले
गेल्या महिनाभरात 6-7 दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात जम्मू येथील रियासी येथे श्रद्धाळूंवर आणि कठुआ येथे हल्ले झाले आहेत. कठुआतील हल्ल्यात पाच जवान शहीद झाले.

रेल्वे अपघात
पश्चिम बंगाल आणि ओरिसामधील रेल्वे अपघात गंभीर मुद्दा आहे. यावरही विरोधक संसदेत प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यावर बैठकीत चर्चा होऊ शकते. सिलिगुडी येथील अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला होता.

मणिपूर हिंसाचार
कुकी आणि मैतई यांच्यात आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. तो अजूनही मिटलेला नाही. राहुल गांधी यांनी मणिपूरचा दौरा केला, परंतु मोदींनी दौरा केला नसल्यामुळे संसदेत लक्ष्य करण्यात येईल. यावरही चर्चा होऊ शकते.

हाथरस चेंगराचेंगरी घटना
युपीतील हाथरस चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तिथे योगी सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे. संसदेत हा मुद्दा मांडला जाणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकार उत्तर तयार ठेवणार आहे.

कावड यात्रा
युपी सरकारने कावड यात्रेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा एनडीएच्या घटकपक्षांनीच विरोध केला आहे. त्यामुळं सरकार अगोदरच अडचणीत सापडलं आहे. पावसाळी अधिवेशनापुर्वी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत एनडीएतील घटक पक्षांसह इंडिया आघाडीत पक्षांनी यांनी कावड यात्रेसंदर्भात घेतलेला निर्णय परत घेण्याची मागणी केली आहे

You may have missed